रविवार, ८ डिसेंबर, २०१३

अज्ञात कवी

मी लिहेन केव्हातरी
एक कविता
जी लोकांच्या मनाचा
वेगळाच ठाव घेईल

चिरून काढेल जी
वाचकाचे अंतरंग
आणि ती कविताच
माझी ओळख होऊन जाईल

ही कविता मला घेऊन जाईल
वाचकप्रसिद्धीच्या ढगात
माझ्या लिखाणाचा ठरेल ती
वळण बिंदू!!

हिच्या प्रभावामुळेच
मग लोक माझ्या
जुन्या कवितांनाही वाचू लागतील
समजून घेऊ लागतील, दादही देतील

ती कविता माझ्याने
लिहून होई पर्यंत
कदाचित मी एका मोठ्या जगासाठी
अज्ञातच राहीन.

अश्याच अनेक अज्ञात कवींप्रमाणे
ओळख नसलेला कवी.

[कणा कवितेने मला कुसुमाग्रजांचे वेड लावले, प्रेम म्हणजे सेम असतं या कवितेने पाडगावकरांचे वेड लावले, बघ माझी आठवण येते का आणि गारवा ने सौमित्र चे वेड लावले, पुसणारं कोणी असेल तर या ओळींनी चंद्रशेखर गोखलेंच्या प्रेमात पाडले, इतकेच मला सरणावर जाताना कळले होते या ओळींनी मी सुरेश भटांवर फिदा झालो, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता या ओळीने ग्रेस च्या प्रेमात पडलो, श्रावणमासी ने बालकवी, चाफा बोलेना ने भारातांबे, अरे संसार संसार ने बहिणाबाईंना ओळखायला लागलो, अशी किती उदाहरणे देऊ जिथे काही ओळींनी कवीच्या प्रेमात पडायला झाले आणि मग त्या कवीच्या सगळ्या कविता शोधून वाचायचे वेड लागले]

~ तुष्की
नागपूर
८ डिसेंबर २०१३, २३:००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: